Pages

Saturday, March 15, 2014

वसंत फुललाही...!

डॉ. श्री. द. महाजन



दिनांक १६ फेब्रुवारी ते २५ एप्रिल या काळात फुलणारी फुले हा खरा वसंत! तेव्हा वसंत ऋतू केव्हाच सुरू झालाय आणि कुसुमाकर, वसंतात्मा मधुमास हा मार्च महिना आहे, चैत्र नाही! त्यामुळे आता तरी गुलमोहर फुलायला लागल्यावर वसंत ऋतूच्या आगमनाचा डंका पिटू नये आणि पाडव्याच्या सुमाराला वसंताच्या आगमनाचे गोडवे गायले जाऊ नयेत.



वर्षानुवर्षे आम्ही घोकत आलोयत, की ‘चैत्र-वैशाख वसंत ऋतू.’ या वर्षी पाडवा म्हणजे वर्षप्रतिपदा आहे ३१ मार्चला. ही चैत्र महिन्याची सुरुवात आणि वैशाख अमावास्या आहे २८ मे या दिवशी. म्हणजे संपूर्ण एप्रिल आणि जवळजवळ सगळा मे महिना हा वसंत ऋतूचा काळ आहे? मग भाजून काढणारा उन्हाळा, ग्रीष्म ऋतू केव्हा आहे? कारण, ६ जूनला (क्वचित ७ जून) तर वर्षा ऋतू सुरू होणार. मृग नक्षत्र लागणार. पावसाळा त्याच्या जवळपास सुरूच होणार. काही वर्षांपूर्वी तर मला आठवतंय, पाडवा ६ एप्रिलला आला होता आणि वैशाख संपणार होता २ जूनला. ग्रीष्म ऋतू, भाजून काढणारा ‘वैशाख वणवा’ असं काही अस्तित्वातचं नसतं, असं समजायचं का? आपली चैत्र-वैशाख वसंत ऋतू ही समजूत चुकीची तर नाही ना? आमचा हा समज करून दिलाय मुख्यत: संस्कृत साहित्याने.

निसर्गसखा वसंत ऋतू आणि निसर्गसौंदर्य यांचा अतूट परस्परसंबंध सर्वांनाच माहीत आहे. प्राचीन काळातील लेखक आणि कवी यांच्यापासून ते आजच्या साहित्यिकांपर्यंतच्या ललित वाड्मयातील वसंतवर्णने वाचताना मन वेडावून जाते! महाकवी कालिदास तर या मोहमयी ऋतुराजाच्या प्रेमातच पडलाय. संतश्रेष्ठ मुक्तेश्‍वरसुद्धा म्हणतात- ‘पुष्पधूळीमाजी लोळे वसन्त।’ कविकुलगुरू कालिदासाने- जो ‘उपमा कालिदासस्य’ म्हणून नावाजलेला आहे- त्याने ‘ऋतुसंहारा’मध्ये लिहिलंय -

आदीप्तवन्हिसहशैर्मरुतावधूतै सर्वत्र किंशुकवतै कुसुमावनम्रै:।

सद्यो वसन्तसमये हि समाचितेयं रक्तांशुका नववधूरिव भाति भूमि:।।

अर्थ : ‘अग्निसारख्या लाल पुष्पसंभारांनी पळसाची झाडे लवलेली आहेत; त्यामुळे भूमी एखाद्या लाल वस्त्र परिधान केलेल्या नव्या नवरीसारखी शोभून दिसत आहे!’ नव्या नवरीला तर आपल्याकडे हिरवी साडी नेसवतात, लाल नाही! पण कालिदास वाड्मयात तर अशी चूक शोधूनही कुठे मिळत नाही! (मराठी साहित्यात तशा चुका पदोपदी आढळतात!) मी एकदा मार्च महिन्यात मध्य प्रदेशात गेलो असताना, लक्षात ठेवून भोपाळला मुद्दाम एका लग्नसमारंभामध्ये जाऊन पाहिले. नववधू नारिंगी-लाल वस्त्रामध्ये सजवली होती! वसन्तकालामध्ये लग्नसराई असते आणि उत्तर भारतात नववधूला आजही लाल साडीच नेसवली जाते. तीही बहुधा किंवा शक्यतो पळसफुलांपासून केलेल्या लाल-नारिंगी रंगांनीच रंगवलेली असते! कविकुलगुरूच्या अजोड निरीक्षणवर्णनापुढे पुन्हा एकदा नतमस्तक झालो!

गेल्या २३ फेब्रुवारीला रविवारी आम्ही मुळशी शेडाणीच्या जंगलात गेलो होतो. तत्पूर्वी, मी दुर्गसाहित्य संमेलनासाठी सज्जनगडावर गेलो होतो. जंगलामध्ये पळस भरभरून फुलले होते! नाशिक-डांग-खान्देश- विदर्भातले पळस फेब्रुवारीअखेरपासून ‘रंगात यायला’ सुरूवात होते आणि मार्चमध्ये पुष्पोत्सवाच्या शिखरावर असतात. म्हणजे कालिदास म्हणतो तसा पळस आमच्याकडे वसंतात फुलत नाही? का पळस फुलतो तोच आमचा वसंतकाल असतो?

ऋतुचक्र आणि सौरवर्ष

भारत हा खंडप्राय देश आहे. संस्कृत साहित्य बहुतेक सर्व उत्तर भारतात लिहिलं गेलंय. तिथली भौगोलिक परिस्थिती, तिकडचं हवामान दक्षिणेकडच्या राज्यांपेक्षा भिन्न आहे. पळसच काय; पण अगदी आम्रवृक्षसुद्धा उत्तरेकडे उशिरा मोहरतात, एप्रिलमध्ये मोहरतात; म्हणून तर तिथले दशेरा आदी आंबे आपल्याला जुलै-ऑगस्टमध्ये खायला मिळतात! शेकडो किलोमीटर उत्तर-दक्षिण पसरलेल्या आपल्या देशामध्ये वसंत ऋतू सगळीकडे एकाच वेळी येत नाही! दुसरी फारच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋतुचक्र हे सौरवर्षाशी निगडित आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीवर ते अवलंबून आहे. आपली कालगणना- मराठी महिन्यानुसार- चांद्रमासांवर बेतलेली आहे. ती सौरवर्षाशी जुळवून घेण्यासाठी ‘अधिक मासा’ची योजना केलेली असते. त्यामुळे भौगोलिक ऋतूंच्या दृष्टीने मराठी महिने मागेपुढे होतात.

सुप्रसिद्ध लेखिका, मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा विदुषी दुर्गा भागवत यांच्याही ही गोष्ट नीट ध्यानात न आल्यामुळे त्या गडबडलेल्या दिसतात. त्यांच्या ‘ऋतुचक्र’ या नावाजलेल्या ग्रंथात त्या म्हणतात, ‘श्रावणाची साखळी असते, तशीच वसंताची. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यायलेले, बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हाने अंग भाजणारे.. तरीपण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, कुसुमाकर आहे.’ चैत्राला असे कुसुमाकर म्हणून गौरवल्यावर त्यांच्या ध्यानात येते, की हा पुष्पसोहळा तर फाल्गुनातच साजरा होतो! त्या पुढे लिहितात- ‘नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन तर फाल्गुनातच घडते; मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे.?’

बहुतेक सर्व मराठी साहित्यिकांचे निसर्गाचे प्रत्यक्ष ज्ञान, निरीक्षण, तपशील, अभ्यास हे सर्व तोकडे पडते. या पार्श्‍वभूमीवर, महाकवी कालिदासाचे भूगोलाचे आकलन, निसर्गनिरीक्षणावर आधारित ज्ञान आणि सांस्कृतिक भान आपल्याला स्तिमित करते. त्याच्या काळातील प्रवासाच्या सुविधा, प्रसारमाध्यमांची परिस्थिती यांचा विचार केल्यावर, तर तो एक महान चमत्कारच ठरतो. त्याचे आणि इतर अनेक संस्कृत साहित्यिकांनी ठासून सांगितलेले गृहीतकृत्य ‘चैत्र-वैशाख वसंत ऋतू’ हे उत्तर भारताला बर्‍यापैकी लागू पडते. आपण तेच घोकणे आणि डोळे झाकून मानणे, हे निखालस चुकीचे आहे.

आता हेच पाहा ना. मकर संक्रांत आपण तिथीप्रमाणे साजरी करीत नाही! संक्रांत नेहमी १४ जानेवारीलाच (क्वचित १५ जानेवारी) येते. मृग नक्षत्र ६ किंवा ७ जूनला लागते, इंग्रजी तारखेप्रमाणे. इंग्रजी कालगणना सौरवर्षानुवर्ती आहे; म्हणून आपण आपले ऋतूसुद्धा इंग्रजी कॅलेंडरनुसार ठरवून घेतले पाहिजेत. इतर सर्व व्यवहारातसुद्धा आपण याच कालगणनेचा वापर करतोच आहोत. या विषयातला व्यासंगी विद्वान माझा मित्र डॉ. प. वि. वर्तक म्हणतो, की ‘२१ मार्च रोजी ‘वसंत संपात’ असतो. त्याच्या आधीचा एक आणि नंतरचा एक महिना हा वसंत ऋतूचा काळ समजावा.’







कुसुमाकर पुष्पोत्सव

महाकवी कालिदासाने (उत्तर भारतात) वसंतात फुलणार्‍या अनेकानेक वृक्षांची बहारीची वर्णने केलेली आहेत. त्यातले प्रमुख आहेत- आम्र, कर्णिकार, कांचन (कोविदार), जंबू (जांभूळ), नक्तमाल (करंज), पलाश (पळस), त्रियाल (चारोळी), पुन्नाग (उंडी), मधूक (उत्तर मोह), रक्ताशोक (सीताअशोक), शाल्मली (काटेसावर) आणि शिरीष. यातला कर्णिकार सोडला, तर बाकीचे सर्व वृक्ष आपल्याकडे (महाराष्ट्रात) १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल याच काळात फुलतात, तोच आपला वसंत ऋतू आहे. कर्णिकारचा अपवाद तरी खरोखरचा आहे का? कर्णिकार ओळखण्यात आपली काही चूक होतेय? ‘कुमारसंभवा’तील पार्वतीच्या वर्णनात महाकवीने-

आकृष्टहेमद्युतिकर्णिकारं वसन्तपुष्पाभरणं वहन्ती।

असं म्हटलंय. यात फुलांचा रंग सोनेरी पिवळा असल्याचं आणि ती कर्णालंकार म्हणून वापरत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्या दृष्टीने विचार केला, तर कर्णिकार हा सामान्यपणे समजला जाणारा बहावा (उं२२्रं ा्र२३४’ं) नसून सोनसावर (गणेर, उूँ’२स्री१े४े १ी’्रॅ्र२४े ) असावा, नव्हे आहेच. सोनसावर आपल्याकडे मुख्यत: फेब्रुवारीत फुलतो, तर बहावा एप्रिल-मेमध्ये, ग्रीष्मात फुलतो. अरुंधती वर्तकच्या संशोधनानुसार आणि माझ्याही अभ्यासावरून सोनसावर हाच कर्णिकार असल्याचे मान्य केले, तर तोही आपल्या वसंत ऋतूतच (१६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल) फुलणारा आहे. त्याशिवाय, महाराष्ट्राचा राज्यपुष्पवृक्ष तामण तथा जारूल, शिवण, अंजनी, अंजन, आपटा, तिवस (काळा पळस), वारस, फणशी, रानपांगारा, कौशी, भेरा, भोकर असे अनेकानेक वृक्ष याच काळात, म्हणजे १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या ऋतूतच फुलतात. याशिवाय, असंख्य वेली व फुलझाडेही याच काळात पालवतात, फुलतात आणि सौंदर्यवंत वसंताची शोभा वाढवतात. तरी कृपया, यापुढे गुलमोहर फुलायला लागल्यावर वसंत ऋतूच्या आगमनाचा डंका पिटू नये आणि पाडव्याच्या सुमाराला वसंताच्या आगमनाचे गोडवे गायले जाऊ नयेत. पुण्यातील नावाजलेल्या आणि इतरही शहरांतील मुख्यत: मे महिन्यात आयोजित केल्या जाणार्‍या व्याख्यानमालांना कृपया ‘वसंत व्याख्यानमाला’ म्हणून नावाजू नये. किमानपक्षी वसंत व्याख्यानमालेची सुरुवात तरी वसंत ऋतू संपण्यापूर्वी म्हणजे १६ एप्रिलपूर्वी करावी, ही विनंती!



निसर्गनिरीक्षणावर आधारित ऋतूंचे वेळापत्रक

ऋतू काल

१. वसंत १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल

२. ग्रीष्म १६ एप्रिल ते १५ जून

३. वर्षा १६ जून ते १५ ऑगस्ट

४. शरद १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर

५. हेमंत १६ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर

६. शिशिर १६ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी

या वेळापत्रकाप्रमाणे वसंत ऋतू केव्हाच सुरू झाला आहे आणि कुसुमाकर, वसंतात्मा मधुमास हा मार्च महिना आहे, चैत्र नाही!

(लेखक ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ व अभ्यासक आहेत.)



from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

No comments:

Post a Comment