Saturday, March 15, 2014

विटेएवढ्या गारा?

- हेमंत लागवणकर

ऐन उन्हाळ्यात पाऊस आणि बर्फाची चक्क विटेपेक्षा मोठी गार! कशामुळे बिघडले असेल हवामानाचे तंत्र? यामागच्या शास्त्रीय कारणांचा वेध..



जागतिक आणि स्थानिक पातळीवरील हवामानाच्या विशिष्ट परिस्थितीमुळे सध्या फेब्रुवारी-मार्चमध्ये देशभर पाऊस पडत आहे. या घटनेमागे ध्रुवीय प्रदेशातून येणारे थंड वारे, समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि प्रशांत महासागरात निर्माण होणारी एल निनोची स्थिती यांचा परिणाम कारणीभूत आहे.

कशाने झाली ही गारपीट?

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल-मे महिन्यामध्ये वातावरणातील बाष्पाचं प्रमाण आणि तापमान वाढून स्थानिक पातळीवर मेघगर्जनेसह पाऊस पडतो. याच पावसामध्ये काही वेळा गाराही पडतात; मात्र त्यांचं प्रमाण कमी असतं. फेब्रुवारी-मार्चमध्ये हिवाळा संपत येताना जमिनीपेक्षा समुद्राच्या पाण्याचं तापमान तुलनेने अधिक असतं. अशा स्थितीमुळे समुद्रावर कमी दाबाचा पट्टा, तर जमिनीवर जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. यामुळे जमिनीवरील जास्त दाबाकडून समुद्रावरील कमी दाबाकडे वारे वाहू लागतात आणि विरुद्ध दिशेने फिरून पुन्हा जमिनीकडे प्रवास करतात. जमिनीवर येताना हे वारे समुद्रावर तयार झालेले बाष्पही घेऊन येतात.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेले असे बाष्पयुक्त वारे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या भागांत एकवटले. दोन्ही दिशांनी आलेले हे वारे एकमेकांना धडकून वातावरणात उंचावर गेले. ध्रुवीय प्रदेशातून आलेल्या थंड वार्‍यांच्या प्रवाहांमुळे या बाष्पयुक्त वार्‍यांचं तापमान आणखी कमी झालं. बाष्पयुक्त ढगांचे तापमान शून्याहून खाली घसरलं आणि बाष्पाची गार बनली.

ध्रुवीय प्रदेशातून येणार्‍या वार्‍यांमुळे काय घडतं?

साधारणपणे डिसेंबरमध्ये ज्या वेळी सूर्य दक्षिण गोलार्धात त्याच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचतो, त्या वेळी उत्तर ध्रुवीय प्रदेशात थंड वार्‍यांचे प्रवाह मोठय़ा प्रमाणात निर्माण होतात. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या वार्‍यांचा जोर वाढून ते ध्रुवीय प्रदेश ओलांडून पश्‍चिमेकडून पूर्वेकडे संपूर्ण पृथ्वीवर वाहणार्‍या वार्‍याच्या प्रवाहामध्ये प्रवेश करतात. या थंड प्रवाहांमुळेच कॅनडा, अमेरिकेपासून युरोप, काश्मीर, जपानमध्ये दर वर्षी हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असते. यंदा हे थंड वारे महाराष्ट्रावरूनही वाहत आहेत. या वार्‍यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रावरील वातावरणाचा गोठणबिंदू जमिनीपासून चार किलोमीटर उंचीपर्यंत घसरला आहे. ज्या तापमानाला पाण्याचं बर्फात रूपांतर होतं, असं तापमान सर्वसाधारणपणे जमिनीपासून पाच किलोमीटर उंचीवर असतं. पाच किलोमीटर उंचीवर हवेतील बाष्पाचा बर्फ झाला, तरी तो जमिनीवर येईपर्यंत वितळून त्याचं पाणी झालेले असतं. मात्र, उत्तर ध्रुवीय प्रदेशात थंड वार्‍यांच्या प्रवाहामुळे गोठणबिंदू जमिनीपासून चार किलोमीटर उंचीवर असल्यामुळे बाष्पाचा बर्फ जमिनीवर येईपर्यंत पूर्णपणे न वितळता गारांच्या स्वरूपात खाली आला.

भल्यामोठय़ा गारा

लहान आकाराची गार भूपृष्ठावर येण्यापूर्वीच विरघळून जाते. पण, मोठय़ा आकाराची गार प्रचंड वेगाने जमिनीवर आदळते. काही वेळा अनेक गारांचा पुंजका एकत्र होऊन बर्फाची लादीच खाली येते. तिचा आकार कितीही मोठा असू शकतो. गारांचा आकार हा वातावरणाच्या तापमानावर अवलंबून असतो. तापमान जेवढं कमी, तेवढा गारांचा आकार मोठा. जिथे उंचावरील तापमान शून्याखाली साठ अंश सेल्सियस झालं, तिथे मोठय़ा आकाराच्या गारा पडल्या.

गारांचा प्रचंड वेग

गारांचा वेग हा त्यांच्या आकारावर अवलंबून असतो. एक सेंटिमीटर व्यासाची गार सुमारे नऊ मीटर प्रतिसेकंद या वेगाने खाली येते. गारेचा आकार जेवढा जास्त, तेवढा तिचा वेगही जास्त असतो.

गारपिटीच्या नोंदी

इतिहासात डोकावलं, तर गारपीट आणि त्यात झालेले नुकसान याची उदाहरणं जगभर सापडतात. नवव्या शतकात रूपकुंड येथे एका टोळीचे सुमारे दोनशे लोक अचानक आलेल्या गारांच्या वादळी वर्षावात मरण पावले. या लोकांच्या सर्व कवट्या मागच्या बाजूने जड वस्तूंच्या आघाताने फुटलेल्या सापडल्या होत्या. चौदाव्या शतकात इंग्रज सैन्य पॅरिसवर हल्ला चढवून परतत असताना अचानक गारांचं वादळ झालं आणि त्यात हजारभर सैनिक, घोडे मृत्युमुखी पडले. अठराव्या शतकाच्या आधी झालेल्या प्रत्येक गारपिटीच्या नोंदी आज उपलब्ध नाहीत; पण त्यानंतर जगभरात सर्वत्र अशा नोंदी ठेवल्या गेल्या आहेत.

(लेखक विज्ञान अभ्यासक आहेत.)



from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

Bagikan

Jangan lewatkan

विटेएवढ्या गारा?
4/ 5
Oleh

Subscribe via email

Suka dengan artikel di atas? Tambahkan email Anda untuk berlangganan.